मराठवाड्यातील उदगीर येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले त्याला आता महिना होत आहे. पण संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणावर काही लोक संतप्त झाल्याच्या बातम्या अजूनही येत आहेत. साहित्य संमेलनाच्या अलीकडच्या इतिहासात झाले नाही, असे अध्यक्षीय भाषण प्रथमच झाले. मागच्या एका संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले होते, ‘राजा तू चुकलास!’ पण उदगीरच्या संमेलनात सासणे यांनी त्या ‘चुकांची’ भीषणता त्यांच्या खास शैलीत अध्यक्षीय भाषणात सांगितली म्हणून काही लोकांना ते आवडले नसावे, असे वाटते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सासणे म्हणतात, “संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांतर्गत या घटनेचे पडसाद बहुदा पडलेले नाहीत.” सासणे यांनी आजच्या लेखकांना आणि राज्यकर्त्यांना असे थेट प्रश्न विचारले आहे, हे त्यांचे चुकले म्हणून काही संघटना त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आता सभांचे आयोजन करीत आहेत.
भारत सासणे हे गंभीर प्रकृतीचे लेखक आहेत. त्यांच्या विशिष्ट शैलीतील कथांनी मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. ते एक जबाबदार लेखक आहेत. जबाबदार लेखकाची भूमिका काय असावी याचा प्रत्यय त्यांच्या उदगीरच्या अध्यक्षीय भाषणातून येतो. कोणत्याही जबाबदार लेखकाला अवतीभवती काय जळत आहे, त्याचा शोध घ्यावासा वाटतो.
एरवी स्वनामधन्य लेखक-कवींना त्यांच्या अवतीभवती धूर दिसत असूनही काही जळत असल्याचे त्यांना जाणवत नाही. पुरस्कार आणि पदे यांचे बोळे त्यांच्या नाकाकानात कोंबलेले असतात. पण सासणे यांच्या अनेक कथांतील नायक जसा अस्वस्थ आढळतो, तसेच उदगीरच्या अध्यक्षीय भाषणातील भारत सासणे अस्वस्थ दिसतात.
सासणे यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांना मात्र ‘लेखकांनी आपल्या आंतरिक अस्वस्थतेचा वाटेल तेवढा शोध घ्यावा, आमचे काही म्हणणे नाही पण अवतीभवतीच्या वास्तवाचा शोध घेऊ नये’, असे वाटत असते. अशा लोकांना आता सासणे यांच्या भाषणात काहीतरी भयंकर आक्षेपार्ह आहे, असे वाटू लागले आहे. मनोरंजन किंवा बुद्धीरंजन हा साहित्याचा खरा उद्देश असू शकत नाही. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अशा माणसाचा शोध घेणं माझ्या लेखनाचे प्रयोजन आहे, असे सासणे आपल्या भाषणात स्पष्टच सांगतात. सामान्य माणसाचा शोध घेणं म्हणजे काय? सामान्य माणूस आज ज्या गर्तेत सापडला आहे, त्या वास्तवाचा शोध घेणं नव्हे का? बेकारी, महागाई, शिक्षण-आरोग्याचे खासगीकरण, न्यायवंचित असणे, धार्मिक कट्टरता, अभिव्यक्तीवरील बंधने या गोष्टी सामान्य माणसाचे जगणे अधिक दुर्धर करीत असतील, तर हे वास्तव लेखकाला दिसू नये का? त्यामुळे तो अस्वस्थ होऊन व्यवस्थेला काही प्रश्न विचारू लागला तर लेखकाने आपली सीमा ओळखावी. त्याने राजकीय प्रश्न विचारू नये असे म्हणून त्याच्यावर दबाव टाकावा, हे कोणत्या सुदृढ व सुसंस्कृत समाजव्यवस्थेचे लक्षण आहे?
भारत सासणे यांना सर्वसामान्यांच्या जगण्याबद्दल, त्याच्या छोट्या छोट्या लढायांबद्दल आस्था आहे. ते म्हणतात, सर्वसामान्य माणसांच्या संभ्रमावस्थेबाबत कुतूहल लेखकाला चिंतनशील बनवतं. सामान्य माणसाच्या दु:खाचा परिहार कसा होऊ शकेल याबाबत काहीएक चिंतन लेखकाला श्रेष्ठत्वाच्या दिशेने घेऊन जाते. सामान्य माणसांच्या प्रश्नांशी आणि मातीशी सासणे यांची नाळ जुळलेली आहे. त्या नाळेतूनच त्यांना जीवनरस प्राप्त होतो, म्हणून त्या नाळेशी त्यांची बांधिलकी आहे.
भारत सासणे आपल्या भाषणातून खंत व्यक्त करतात की, आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून, क्वचित तेंडूलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून दिसला होता. आता मात्र हा चेहरा धुसर दुसर होतो आहे. मनोरंजनपर, बुद्धीरंजनपर साहित्य अलीकडे मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा होतो आहे. आजचा लेखक सत्य म्हणजे काय याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरत नाही आणि व्यापक अशा जीवनाचा तो अभ्यासच करीत नाही, असे ते म्हणतात.
साहित्यातून सामान्य माणूस हद्दपार
मराठी साहित्यातून सामान्य माणूस जसा हद्दपार झाला आहे, तसेच राजकीय वास्तवही त्याला अस्पृश्य वाटते. सासणे उदाहरण देतात की, महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाददेखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. महात्मा गांधींचं योग्य ते आकलनच मराठी लेखकांना नीटसं झालेलं नाही. वर्तमानात घडणाऱ्या देशातील आणि जगातील घटनांचे प्रतिबिंब साहित्यात पडण्याची शक्यता किती उरली आहे, हा खरा प्रश्न आहे.
भारत सासणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्यातील भाषेवरही भाष्य केले आहे. ते म्हणतात, अभिजन कोण तर अभिजात भाषा बोलतात ते आणि अभिजात भाषा कोणती तर अभिजन बोलतात ती. विद्वानांनी निवाडा दिला नसला तरी संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, असा निवाडा राजकीय पक्षाचे पदाधिकारी देतात त्याची साहित्याला चिंता वाटली पाहिजे. भाषेवर माणसांची ओळख कशी करणार ? पाली इत्यादी भारत प्राचीन भाषांचे काय करणार? उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ती भारतीय भाषा आहे हे कोण सांगणार ?
पण उदगीर संमेलनाच्या महिनाभरानंतर असा दबाव वाढू लागला आहे. केवळ भारत सासणे यांचे भाषण एक निमित्त आहे. सारी प्रसारमाध्यमे आणि साहित्य-कलांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रात विरोधाची कोणतीही फट राहता कामा नये याची खबरदारी सनातन्यांना घ्यायची आहे, असे दिसते. सासणे यांच्या नंतर कोणीही लेखक तसे प्रश्न विचारू शकतो, हे सनातन्यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान वाटू लागले आहे.
वर्मी लागणारे दोन मुद्दे
भारत सासणे यांच्या भाषणातील त्यांच्या वर्मी लागणारे खरे दोनच मुद्दे होते. एक म्हणजे कोविड महामारीच्या काळातील थाळ्या वाजवण्याच्या प्रकारावर केलेले गंभीर भाष्य. आणि दुसरे त्यांचे समकाळाला ‘भ्रमयुग’ संबोधणे. सासणे यांच्या मते थाळी वाजवण्याचे प्राचीन संदर्भ भीषण आहेत. दुष्काळात भुकेकंगाल लोक अन्नासाठी थाळी वाजवत दाही दिशांना फिरत असत. सासणे यांनी आपल्या भाषणात या प्रकारातील अशुभ व अपवित्र असा भाव उघड केला. त्यांनी वर्तमानकाळाला ‘भ्रमयुग’ का संबोधले हेही उघडच आहे. आज शिक्षणातील अभ्यासक्रम असो की प्रसार माध्यमांतील कन्टेट असो प्राचीन प्रतिक-परंपरांचे अवैज्ञानिक उदात्तीकरण केले जात आहे. हेच ‘भ्रमयुग’ आहे.
आपल्या युगाचे असे निदान करणे आणि राज्यकर्त्यांना आरसा दाखवणे हे कोणत्याही जबाबदार लेखकाचे कर्तव्यच असते. परंतु सासणे यांनी केलेले धाडसच त्यांची चूक ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्य सांगणाऱ्या लेखकाला खोटं ठरवण्याचा हा पोस्टट्रूथचा काळ आहे. सासणे म्हणतात, “एक देश. एक भाषा. एक पुस्तक. एक संस्कृती असं काहीसं कोणीतरी म्हणत आहे. लेखकाला यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो. पण हा केवळ मॅडनेस नाही. विचारपूर्वक केलेले चिथावणीखोर विधान देखील आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही. ते धर्मही नाहीत. असलेच तर पंथ आहेत, असेही कोणीतरी म्हणतो आहे.” सासणे यांनी इतके स्पष्ट सांगण्याची चूक केली आहे.
या भ्रमिष्ट काळात विविध धर्म, विविध संस्कृतीचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना अचानक कोणीतरी दंगल भडकविणारे विधान करतो आणि आसमंत पेट घेतो, हे विदारक वास्तव सांगताना आपल्या भाषणात सासणे एक गोष्ट सांगतात; “एकदा एका गावी लेखक गेला होता. एका बड्या घराच्या अंगणात बांधलेली कुत्री त्याच्या अंगावर अकारण भुंकू लागली. लेखकाने घर मालकाकडे तक्रार केली. त्याला म्हटले की तुमची कुत्री आमच्यावर भुंकत आहेत. घराचा मालक म्हणाला, आम्ही काही त्या कुत्र्यांना भुंकायला सांगितलेलं नाही. लेखक म्हणाला, पण तुम्ही भुंकू नका असेदेखील सांगितले नाही.”
भारत सासणे यांचे काय चुकले असेल तर हे! लेखकांनी हे असेच सहन करीत राहिले तर हे जग कुत्र्यांच्या हिंसक भुंकण्यांनी भरून जाईल. म्हणून आता वेळ आलेली आहे. सामान्य लोकांनी उच्च रवाने घर मालकाला विचारायला हवे की, ‘पण तुम्ही भुंकू नका, असेदेखील सांगितले नाही.’
[email protected]
लेखकाने भूमिका घ्यायलाच हवी.
खरे वास्तव मांडले आहे
सडेतोड
उत्तम विश्लेषण …
भारत सासणे यांच्यावर संताप व्यक्त करणारे करीत राहतील . त्यांचे भाषण सामान्य माणसांसंबंधी भावना व्यक्त करणारे आहे .. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या सत्तेसमोर प्रश्न विचारले आणि त्यातून समाजाचे प्रखर वास्तव मांडले .. समाजाभोवतीचे वास्तव बदलण्यासाठी सर्वांनी काम करावे .. किमान भारत सासणे यांच्या भाषणातील संदर्भ वास्तवाच्या कारणांसह समजून घ्यावे .. निदान एवढे तरी करावे .. कुरकुरीच्या मनोवृत्तीतून बाहेर यावे ..