अठरा वर्षे वय पूर्ण असलेली एखादी सेक्स वर्कर स्वत:च्या इच्छेने हा व्यवसाय करत असेल तर पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये असे आदेश अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिले. थोडक्यात वेश्या व्यवसायाला अन्य कोणत्याही व्यवसायाप्रमाणे कायदेशीर दर्जा मिळाला आहे. यावरून बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळाली म्हणून वेश्यावस्तीत उत्सव साजरे करण्यात आले.दुसरीकडे या निमिताने स्त्री-पुरुषसंबंधांबद्दल आणखी काही सूक्ष्म प्रश्न निर्माण झाले. वेश्याव्ययासायाच्या छत्राखाली स्त्रियांचे शोषण अन्यायकारक नाही का? कायदेशीर मान्यता म्हणजे त्या शोषणव्यवस्थेला मान्यता नव्हे का? असे शोषण केवळ वेश्याव्ययासायातच होते का? विवाहसंस्थेमध्ये असे शोषण होत नाही का? ‘शरीर’ हे भांडवल म्हणून वेश्या वापरते आणि अन्य स्त्रिया वापरतात त्यात मूल्यात्मक काही फरक आहे का/ इत्यादी प्रश्न. अशा प्रश्नांना सामाजिक नितीमत्ता आणि सांस्कृतिक गंड यांचा स्पर्श असल्याने, त्यांची सोडवणूक फार गुंतागुंतीची होते. याच संदर्भातील काही सुट्या सुट्या नोंदी.
•••
‘मंडी’, ‘कमला’ आणि ‘आस्था’
श्याम बेनेगल यांच्या ‘मंडी’ मध्ये एक मार्मिक प्रसंग आहे. शहरातील वेश्यांच्या वस्तीवर संस्कृती रक्षक महिला मंचाचा मोर्चा जातो. शहरातून ती गंदगी हटविण्यासाठी एक महिला नेता जोरजोरात भाषण करते. तेंव्हा एक वेश्या (शबाना आझमी) त्या महिलेला प्रश्न करते, “ धंदा बंद करेंगे तो फिर हम पेट कसा भरेंगे?” यावर ती संस्कृती रक्षक महिला, “पेट भरनाही सब कुछ नही है” असे ‘संस्कार’ छाप उत्तर देते. यावर ती अत्यंत सामान्य वाटणारी वेश्या एक विलक्षण उद्गार काढते, “आपको मुफ्तमे मिलता होगा” हे तिचे उद्गार जगातील सर्वच मानवी संस्कृती मधील विवाहित स्त्रियांच्या कुटुंबातील स्थान अधोरेखित करणारे आहे. विजय तेंडूलकर यांच्या ‘कमला’ नाटकातील एक प्रसंग प्रसिद्ध आहे. मध्यप्रदेशात आदिवासी स्त्रियांची विक्री होत आहे, हे सत्य जगापुढे आणण्यासाठी ‘कमला’ नावाच्या एका स्त्रीला एक पत्रकार खरेदी करून घरी आणतो. दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिला उभे करायचे असते. घरात कमला आणि त्या पत्रकाराची बायको यांच्यात संवाद होतो. कमला विचारते, “बहेनजी साबने आपको कित्ते मे खरीदा?” बासू भट्टाचार्य यांच्या ‘आस्था’ सिनेमातील तो प्रसंग सर्वांच्याच आठवणीत आहे. मुलीला महागडे जोडे घेऊन देण्याच्या नादात मानसी (रेखा) शरीरसंबंधाच्या जाळ्यात नकळत फसते. ते संबंध तिला नकोसे वाटतात की हवेसे, हे तिचे तिलाच ठरवता येत नाही. मग सहमतीच्या शरीरसंबंधाबद्दल नीती-अनीतीचा न सुटणारा गुंता ‘आस्था’ सिनेमात उभा केला आहे.
भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीत सहजच एक वाक्य येते, “ पुण्यात वेश्या खूपच दिसतात. पण इतके करूनही प्रत्येकीचा नवरा जर तिला बायकोच म्हणतो, तर आपण कशाला बोला” “आपको मुफ्तमे मिलता होगा!” आणि “बहेनजी साबने आपको कित्ते मे खरीदा?” या दोन प्रश्नांमधून वेश्या आणि सामान्य संसारी स्त्री यातील जो फरक अधोरेखित होतो, तो लग्नसंस्थेने निर्माण केलेला आहे. पण उपजीविका आणि लैंगिक संबंध याबाबत त्या स्त्रिया कितपत ‘स्वतंत्र’ आहेत, हा पुन्हा वेगळा प्रश्न निर्माण होतो.
•••
बर्ट्रांड रसेल आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य
बर्ट्रांड रसेल (मॅरेज अँड मॉरल्स) एका ठिकाणी म्हणतात, “बऱ्याचशा स्त्रियांचा विवाह हा आजकाल एक पोटापाण्याचा धंदा झालेला आहे. म्हणून पुष्कळ वेळा बायकांना लैंगिकदृष्ट्या आपल्या मनाविरुद्ध पुरुषांच्या पुढे नमावे लागते. किंबहुना वेश्यांना नाही म्हणण्याचे तरी स्वातंत्र्य आहे, तितकेही विवाहित स्त्रियांना नाही.”रसेलच्या मते, स्त्रीला माणूस म्हणून जगताना देह पोसण्यासाठी शरीराचे भांडवल करावे लागते, हे त्या स्त्रीचे अधःपतन आहे की त्या संस्कृतीचे ? हा सवाल जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच शरीराचे प्रत्यक्ष भांडवल करणारी वेश्या आणि सर्वसामान्य स्त्री यांच्या मानवी जीवनातील स्थानात काही मूल्यात्मक भेद आहे का? असाही प्रश्न पुढे येतो. लैंगिक संबंधात स्त्रीची अगतिकता दाखविणाऱ्या संस्कृतीची मूल्ये कोणती हे प्रश्न अनुत्तरितच राहतात.”
•••
‘वेश्या’ की ‘लैंगिक कामगार’?
वेश्या व्यवसाय हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे आणि या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रहही जुनाच आहे. आपल्या महाराष्ट्राचे माजी आणि दिवंगत राज्यपाल महंमद फजल यांनी सन २००४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून असे विचारले होते की, एवीतेवी सामाजात वेश्यावृत्ती वाढते आहे, ती गरज आहे, हे कटू असेल पण सत्य आहे, मग या व्यवसायाला कायदेशीर मान्यता का देऊ नये? या पत्रावरून तेंव्हा महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला होता.त्यापूर्वी १९९७ मध्ये कलकत्त्यात देशभरातल्या दीड हजार वेश्यांचा मेळावा भरला होता, तोही खूप गाजला. कारण इतिहासात घडलेली अशा प्रकारची घटना होती. हा मेळावा कलकत्त्यातील वेश्यांनी बोलाविला होता. त्यांचे म्हणणे असे होते की, सगळ्या क्षेत्रातील लोक आपापली संघटना बांधतात. मग आम्हीही आमची संघटना करू, आम्हाला ‘वेश्या ‘न म्हणता ‘लैंगिक कामगार’ (सेक्स वर्कर) म्हटले जावे. असे झाले तर इतर कामगारांप्रमाणे वेश्यांनाही काही अधिकार मिळतील. बारबाला किंवा मॉडेलिंगच्या आणि मसाज पार्लरच्या नावाखाली पोलिसांशी चाललेली लपाछपी बंद होईल. सेक्स वर्कर युनियन झाल्यावर पोलिसांचे हप्ते चुकवणे आणि त्यांची पिळवणूक बंद होईल. अर्थात हा केवळ आशावाद होता. तसे काहीच झाले नाही. एकंदरीत वेश्याव्यवसायास कायदेशीर मान्यता द्यावी की नाही, हा प्रश्न साधासरळ नाही. त्याला पुष्कळ कंगोरे आहेत. पण मध्यमवर्गीय मानसिकतेत वेश्यांबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल काही हास्यास्पद गैरसमज आढळतात. त्यावरून वेश्यांकडे पाहण्याचा त्यांचा अमानवी दृष्टीकोन व्यक्त होतो.
•••
दुर्गा भागवत : पुरुष वेश्यांकडे केवळ सेक्ससाठीच जातात असे नाही
पण त्याहीपूर्वी सुप्रसिद्ध विदुषी व समाजशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचेही मत वेश्याव्यवसायास सरकारमान्य मिळण्याविषयी अनुकूल होते. १९५६ मध्ये दुर्गाबाई तमाशा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. तेंव्हा पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटसाठी त्यांनी तमासगिरांच्या निमित्ताने त्यांनी वेश्यांचाही अभ्यास केला होता. पुढे मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेसनेही मुंबईतील वेश्याव्यवसासंबंधी दुर्गाबाईंचे मत मागितले होते. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘युरोपातील जेन काय किंवा आमची जनी काय, दोघी मुळात एकच. त्यांचा अभ्यास करायचा झाला तर, वेश्यांकडे जाणाऱ्या पुरुषांचाही सर्व्हे करायला हवा. त्यांच्या काय गरजा आहेत. गरज फक्त वेश्येला असते असे नाही. कारण पुरुष वेश्यांकडे जातात, ते केवळ सेक्ससाठीच असेही नाही.’’
अर्थात दुर्गाबाईंची सूचना टाटा इन्स्टिट्यूटच्या पचनी पडली नाही. दुर्गाबाईंच्या मते, ‘‘आपल्या समाजातील सेक्शुअल प्रश्न फार जटील आहेत. म्हणून त्या प्रश्नांची तड लागत नाही. लागणारही नाही. कोणत्या बायका वेश्या होतात? का होतात? त्या जगतात कशा? या प्रश्नांची उत्तरे शोधणे अशक्य नाही. पण ते धाडस करण्याची मानसिकता कधीच निर्माण होत नाही.’’
•••
वेश्या व्यवसाय, गुन्हेगारी आणि पुरुषांमधील विकृती
मुंबई विद्यापीठात १९८५ मध्ये डॉ. सुनंदा जोशी यांनी १९७०-७८ या कालखंडातील मुंबईतील महिला गुन्हेगारीवर संशोधन केले होते. त्यांचा निष्कर्ष असा की, ‘‘वेश्या व्यवसाय नसता तर देशातील गुन्हेगारीचे प्रमाण व पुरुषांमधील विकृतीचे प्रमाण वाढले असते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया अतिशय अशिक्षित आणि आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या असतात. त्यांना दुसरा पर्यायच नसतो. त्यांच्या मते, ‘‘पोटापाण्यासाठी जर त्या स्वतःच्या इच्छेने हा व्यवसाय पत्करीत आहेत, तर त्यात सरकारने लक्ष घालण्याचे कारणच काय? या धंद्याला आर्थिक भांडवल लागत नाही. शिक्षण लागत नाही. परंतु वेश्या व्यवसायच नसता तर त्यांनी दुसरे कोणते काम केले असते? पैशासाठी त्यांना चोऱ्या, घरफोड्या कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे गुन्हेगारीत वाढच झाली असती. त्यामुळे वेश्या व्यवसायामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळाच बसला आहे.’’
डॉ. जोशींचा आणखी एक निष्कर्ष असा की, ‘‘जसजशा स्त्रिया शिकू लागल्या, तसतशा त्या पुरुषांच्या दास्यातून मुक्त होऊ लागल्या. आर्थिक मानसिक स्वातंत्र्य आले, समानतेची कल्पना मूळ धरू लागली आणि नोकरी, शिक्षण इ. अनेक क्षेत्रात पुरुषांची जागा स्त्रियांनी घेतली. पण स्त्री स्वातंत्र्यामुळे ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी वाढली. कर चुकविणे, भ्रष्टाचार, धंद्यात फसवेगिरी, कायद्यातील पळवाटा शोधून सरकारला फसविणे, या गोष्टी स्त्रियांना सहज जमू लागल्या. स्त्री स्वातंत्र्यामुळे उच्चस्तरीय वेश्या व्यवसायातही वाढ झाली. चांगल्या व उच्च घराण्यातल्या अनेक स्त्रिया केवळ पैशासाठी, छानछौकीसाठी खुद्द आपल्या पतीच्या संमतीनेच हा व्यवसाय पत्करू लागल्या आहेत. मुंबईसह अनेक मोठ्या शहरात राहणाऱ्या घरंदाज बायका २ ते ५ हजार रुपये नाईट घेऊन आपली हौस भागवत आहेत.’’ थोडक्यात, डॉ. जोशींनी स्त्री-शिक्षण, समानता आणि स्वातंत्र्याचा संबंध भ्रष्टाचार, स्वैराचार व अनैतिकतेशी जोडला आहे.
•••
स्त्रीपुरुष संबंधातील दुटप्पी नैतिकता
दुर्गाबाईंचे निरीक्षण लक्षात घेता, स्त्री स्वातंत्र्यामुळे उच्चस्तरीय वेश्या व्यवसायतही वाढ झाली आणि वेश्या नसत्या तर लैंगिक गुन्हेगारीचे किंवा पुरुषांमधील विकृतीचे प्रमाण वाढले असते, हे डॉ. सुनंदा जोशी यांची मते एकांगी वाटतात. आज इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे वेश्या व्यवसायाचे स्वरूपही हायफाय झाले आहे. नव्या सायबर सेक्स मार्केटिंगचाही विचार करताना स्त्रिया वेश्यावृत्ती का स्वीकारतात या प्रश्नाचे स्वरूप मात्र जुनेच आहे, हे लक्षात घ्यावे लागते. आणि वेश्यांकडे जाणाऱ्या पुरुषांचाही अभ्यास गरजेचा वाटतो. बंडखोर लेखिका गीत साने यांच्या मते स्त्रिया वेश्या व्यवसाय स्वीकारीत नाहीत, तर परिस्थितीमुळे त्या लोटल्या जातात. क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट दिलेल्या, टाकून दिलेल्या, विधवा व लग्न न होऊ शकलेल्या स्त्रिया केवळ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे अगतिकतेने वेश्यावृत्ती पत्करत असतात. म्हणजे रेड लाईट एरिया असो की इंटरनेटवरील वेबसाईट असो वेश्यावृत्तीचा उगम स्त्रीपुरुष संबंधातील दुटप्पी नैतिकता हीच आहे. जुन्या काळातील देवदासी, देवांगणा, गणिका, कंचनी, रक्षा, सामान्य वेश्या असोत की सिनेमा-मॉडेलिंगच्या वेशात देहव्यापार करणाऱ्या कॉलगर्लस् असोत त्यामागे कारण विषम नैतिक मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था हेच आहे, हे लक्षात येते. माणसाच्या शरीराचा एखादा दुखरा अवयव असतो, तो अपरिहार्यपणे सांभाळावाच लागतो, तसा हा व्यापार समाजरूपी देहाचा भागच झाला आहे. त्यामुळे खुलेआम नसला तरी या व्यवसायाला लपूनछपून समाजाची मान्यता आहे, असा त्याचा अर्थ होतो. महानगरांमधील गुंतागुतीची जीवनशैली केवळ व्यापारी-आर्थिक संबधांनी नियंत्रित झालेली आहे. तेथे स्त्रीपुरुषांमधील संबध हे निखळ मानवी भावना, संवेदना व सौंदर्य यावर आधारलेले राहिलेले नाहीत. ते दुषित झाले आहेत. घर-कुटुंब हेही त्यातून सुटलेले नाहीत. तेथे मैत्री, प्रेम, लैंगिक संबंध हे निरपेक्ष उरलेले नाहीत. किंबहुना व्यावसायिक निष्ठेतून प्रेम-शरीरसंबंध आणि वेश्यावृत्ती यांच्यातील सीमारेषाच पुसट होत चाललेल्या आहेत. मध्यंतरी आलेला मधुर भांडारकरचा ‘मेट्रो’ हा सिनेमा यासंदर्भात बोलका आहे.
अगदी अभ्यासपूर्ण आणि सर्वस्पर्शी लेख आहे!